Sunday, September 2, 2012

कळी

         पाचवीचा वर्ग. माध्यमिक शाळेचा पहिला दिवस. 'ब ' वर्गात टाकल्याने जरा रागावलेलेच होते. आमचा आधीचा वर्ग आणि 'क' वर्ग यांची मिळून एक तुकडी तयार केली होती. सर्व मुली! शिवाय नापास झालेल्या मुली होत्याच. २-३ नवीन मुली पण आल्या होत्या. नवीन वर्ग, नवीन शिक्षक आणि विशेष म्हणजे नवीन मैत्रिणी, यांचं कुतूहल वाटत होत. इकडच्या प्रथेप्रमाणे मतदान घेऊन वर्गमंत्री (monitor) निवडण्यात आले. मी वर्गप्रमुख झाले. नव्या गोष्टींचं कुतूहल संपून, अभ्यासाला सुरुवात झाली.
         माझी 'तिच्याशी' ओळख झाली. 'ती' दुसऱ्या शाळेतून आली होती.नवीन प्रवेश! काळा-सावळा रंग, कपाळावर गोंदणाचा ठिपका, दुमडून बांधलेल्या लांबसडक वेण्या, नाकात चमकी...तिच्या बोलण्यात एक ग्रामीण हेल होता. नवीन असल्यामुळे किंवा तिच्यातल्या ग्रामीणपणामुळे, इतर मुली तिच्याशी बोलण्यास किंवा मैत्री करण्यास फार उत्सुक नसतं. माझी आणि तिची ओळख वाढत गेली. ती आधी globe mill passage school मध्ये शिकत होती. ही शाळा माझ्याच विभागात आहे. "महापालिकेची शाळा!" माफ करा, परंतु   आपण कितीही नाकारलं तरीही, आपल्या मनात 'municipality' च्या शाळेबद्दल जरा वाईटच प्रतिमा असते. माझ्याही मनात होती...असो..
          तिला ४ थी ला ६५% मिळाले आणि ती शाळेत पहिली आली. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला, 'अजून चांगल्या शाळेत' पाठवायचं ठरवलं.. आणि तिची रवानगी  माझ्या शाळेत झाली! ती काही माझी अगदी खास मैत्रीण नव्हती. पण तिला जास्त जवळची अशी मीच होते. ती मला बऱ्याच गोष्टी सांगायची. आमची अजून एक ओळख निघाली. माझे बाबा ज्याठिकाणी काम करत, त्याच कंपनीच्या आवारात तिचं घर होत. घर! पत्र्याचं, बैठ घर..ते लोक तिथे नवीनच राहायला आले होते. ती मला सांगायची, "तुझे बाबा भेटतात. भेटले कि नेहमी अभ्यासाबाद्द्ल विचारतात."             
            तिचे आईबाबा आणि ४ भावंड गावी राहत असत. तिला तिच्या मावशीने दत्तक घेतलं होत. मावशी व काकांसोबत ती मुंबईत राहत होती. मधल्या सुट्टीत दमशराज खेळायला ती असे. आमच्या वर्गाच्या लंगडीच्या संघात पण ती होती.. दिवस जात होते...            
            एक दिवस तिने मला सांगितलं, आई आणि मावशीमध्ये वाद आहेत माझ्यावरून. त्याचं फारसं पटतही  नाही एकमेकींशी. मी तरी काय सांगणार तिला! तिचं अभ्यासातलं लक्ष कमी होत चाललेलं. मुळातच मितभाषी होती ती, आता तर खूपच शांत आणि एकटी राहू लागली होती. एक दिवस शाळेत पालकसभा   होती. तिचे मावशी-काका आले होते. आले आणि मागच्या बाकावर बसले.  त्यांच्या एकंदर  पोषाखावरून त्यांच्या परिस्थितीचा अंदाज येत होता. ते आले, बसले आणि स्वतःच्याच विश्वात मश्गुल झाले. एकमेकंशीच बोलत होते, हसत होते. आपण 'शाळेत' आहोत याच त्यांना भानच नव्हतं! बाईंनी तिच्या अभ्यासाबद्दल तक्रार केली, तर त्यांनी ती चक्क हसून उडवून लावली. त्यांना 'तिच्यात' किंवा त्या सभेत काही रसच नव्हता! एक दिवस गावावरून, तिच्या आई आल्या होत्या शाळेत. त्यांच्या चेहऱ्यावर मुलीला भेटल्याचा आनंद लपत नव्हता. खूपच साध्या होत्या त्या.           
             दिवस जात होते. पाचवीतून सहावीत आलो. ती शाळेला खूप दांड्या मारू लागली होती. बाईंनी समजावून सांगितलं, ओरडून सागितलं, पण काही फरक नाही. आणि एक दिवस लक्षात आलं कि ती शाळेत यायचीच बंद झालीये. शाळेतून तिला संपर्क करायचा प्रयत्न झाला. बाबांनी सांगितलं कि, ते लोकं तिथे नाही राहत आता. शाळा तिला शोधत होती..            
             असेच दोन-तीन महिने गेले. ती शाळेत परत येईल याची शक्यता मावळली होती. माझ्याकडे तिच्या काकांचा मोबाईल क्रमांक होता. त्या क्रमांकावर बाईंनीदेखील संपर्क केला होता, पण काही फायदा नाही झाला. एक दिवस बाबा कामावरून आले. कोणाचं लक्ष नाही असं पाहून, बाबांचा मोबाईल घेऊन, मी घराबाहेर आले. घाबरत घाबरत त्या क्रमांकावर फोन लावला. कोणी उचलला नाही. दुसऱ्यांदा उचलला. पण समोरून कोणी 'हेलो' बोलल नाही.
मी: (दबक्या आवाजात) *** आहे का?
काहीच प्रतिक्रिया नाही!
मी: *** आहे का?
पलिकडील व्यक्ती: xxxx कोण पाहिजे? xxx, xxxxxx
तो माणूस दारूच्या नशेत तर्र होता. त्याला बोलायचीही शुद्ध नव्हती. परत फोन करू नका असे तो अडखळत म्हणाला. दारूच्या नशेत तो बरळत राहिला....         
                मी घाबरून फोन बंद केला. 'तो' क्रमांक delete केला..मोबाईलमधून आणि माझ्या वहीतूनपण!मी सहावीत होते, लहान होते..असे अपशब्द ऐकायची सवय नव्हती. कोणालाच, काहीच सांगितलं नाही, पण मनातून भीती वाटत होती, लाज वाटत होती...'ती' पण माझ्याच वयाची होती....काय माहित कुठे गेली.............शिकायची, जगायची संधी मिळाली असेल का तिला???

Monday, July 30, 2012

संप

       पुण्यात राहत होते तेव्हाचा प्रसंग आहे. Architecture च्या पहिल्या वर्षाला होते तेव्हा. आमची Workshop आणि Basic Design ची external jury होती. दोन्ही विषयांचे वर्षभरात भरपूर models बनवले होते. एकाच दिवशी दोन्ही विषय आल्याने जरा पंचाईतच झाली होती. एवढ सामन नेणार कसं? कारण मी राहायचे कोथरूड डेपोजवळ आणि कॉलेज होत, डेक्कन जिमखान्याच्याही पुढे, F.C. रोडवर! तेव्हा पेइंग गेस्ट म्हणून राहत होते, त्यामुळे मदतीलाही कोणी नव्हत.
       Jury च्या आदल्या दिवशी कामात गुंतले असताना बाबांचा फोन आला. त्यांनी नुकतीच t.v.वर बातमी पहिली कि, "उदया पुण्यात रिक्षाचा संप आहे." आमच्या building खालीच रिक्षा stand होता, त्यामुळे ते रिक्षावाले ओळखीचे होते, शिवाय हा काही त्यांचा पहिला संप नव्हता, याआधीही बरेच संप झाले होते. त्यामुळे जास्त पैसे देऊन, यापूर्वी संपातून प्रवास केला होता. बाबांना म्हटलं, "काळजी करू नका आमची setting आहे नेहमीची!"
       माझ्यासोबत माझी वर्गमैत्रिण जान्हवी सुद्धा पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. तिच्या आई Jury च्या आदल्या दिवशी राहायला आल्या होत्या. रात्रभर जागून काम केलं. (आमच्या भाषेत night मारली!) दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता आमची वरात कॉलेजला जायला निघाली. सोबत भरपूर सामान होत. रिक्षा पकडायला खाली आलो. कोथरूड ते कॉलेज 60 ते 70 रुपये होत असत. त्यादिवशी घासाघीस करून रिक्षावाला 150 रुपयांत तयार झाला. रोजची ओळख असूनदेखील! ('संप म्हणजे कमवायचा दिवस!' असच वाटलं मला!) आणि समान तर इतक होत कि, मला आणि जान्हवीला वेगवेगळी रिक्षा करवी लागली. रिक्षा चालू झाली, थोड अंतर गेल पुढे गेल असू, रस्त्यावरच्या एका माणसाने रिक्षावाल्याला हाक मारली, " ओओ कुठे चाललात राव??" "काही नाही, बहिण आहे, कॉलेजला सोडून येतो" रिक्षा न थांबवताच तो बोलला. 
       पोहचले एकदाचं कॉलेजला! दिवसभराच्या धावपळीत संप विसरूनच गेले. जान्हावीचे पालक आले होते, तिला बाहेर जायचं होत, त्यामुळे ती त्यांच्यासोबत लवकर निघून गेली. माझा क्रमांक यायला बराच उशीर झाला ('सावंत' आडनाव असल्यामुळे!!!) Jury झाली. कॉलेजमधून निघाले. 5.30-6 वाजले असतील. वाटल, इतक्या वेळात संप निवळला असेल, पण छे, रस्त्यावर एकही रिक्षा दिसत नव्हती. सुमारे अर्धा तास शोधल्यावर एक रिक्षा दिसली. त्याने 200 रुपये सांगितले. शेवटी घासाघीस केल्यावर 150 ला तयार झाला.शिवाय रिक्षाशिवाय दुसरा पर्यायदेखील नव्हता. बसने एवढ सामान घेऊन जाण कठीण होत. बसले रिक्षात!
        सामान पकडून बसले होते. रिक्षा पौड फाट्याजवळ पोहचली. म्हणजे जवळजवळ अर्ध अंतर पार केलं. दशभुजा गणपती जवळचा पूल पार केल्यावर रिक्षा सिग्नलला थांबली होती. तेवढ्यात एक माणूस रिक्षात रिक्षावाल्याच्या बाजूला येऊन बसला. मला तर आधी काही लक्षातच नाही आलं. त्याने रिक्षावाल्याला रिक्षा उजवीकडे वळवायला सांगितली. मला तर सरळ जायचं होत. मी काही बोलायच्या आधी, त्याने रिक्षा वळवून थांबवली. तो माणूस खाली उतरला. त्याने तिथे पडलेला एक मोठा दगड दोन्ही हातांनी उचलला व तो रिक्षासमोर आला. मला काही कळायच्या आत त्याने तो दगड हवेतून रिक्षेच्या समोरच्या काचेवर मारला. क्षणात माझ्या आजूबाजूला काचांचा खच पडला. किमान मी मागे बसलेले. रिक्षावाला तर पुढे बसलेला. त्याला तर लागलंही असेल. मग एका माणसाने त्याला कॉलरला पकडून खेचून बाहेर काढलं. त्याला त्याने जोरात मुस्कटात मारलं. दरम्यान मी भानावर आले. रिक्षातून बाहेर आले. बाहेर 10-20 लोकांचं टोळकं उभं होत. त्यांनी त्या रिक्षावाल्याला मारायला सुरवात केली. "तुझ्याच भल्यासाठी करतोय ना आम्ही?? कळत नाही का संप आहे ते???? हां हां रिक्षा चालवायला पाहिजे, घे आता." असं बोलत ते लोक त्याला मारत होते. त्यातल्या काहींनी परत आपला मोर्चा रिक्षाकढे वळवला. पुढे काय होणार हे माझ्या ध्यानात आलं. मी त्यांना थांबण्याची विनंती केली. पण ते कुठे भानावर होते! इतक्यात आजूबाजूला खूप लोक गोळा झाले होते. त्यातले काही लोक मध्ये पडले. मी माझं सामान बाहेर काढून घेतलं. त्या माणसांनी रिक्षावाल्याला सोडून दिलं व ते लोक पुढे निघून गेले. नवीन शिकार मिळवण्यासठी! रिक्षावालापण आपली रिक्षा घेऊन निघून गेला. लोकही पांगले.
        आता फक्त मी उरले होते. फूथपाथवर सगळे मॉडेल्स ओळीने ठेवले होते. पाठीवर दप्तर आणि हातात शीट्सचा गठ्ठा या अवस्थेत विचार करत उभे होते. घरी कसं जाऊ? बसने जाणं शक्य नव्हत. परत त्याच किंवा दुसऱ्या रिक्षाने जायचा प्रश्नच नव्हता. अचानक घरची आठवण आली आणि डोळ्यांत पाणी तरळल! बाबांची आठवण आली. वाटलं, घरी राहत असले असते तर बाबांना फोन बोलावलं असतं! पटकन आले असते ते!
         तेवढ्यात मघाशी public मध्ये उभा असलेला एक मुलगा पुढे आला. " Can I help You? Do you want a lift?" नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता,मदतीची खरंच गरज होती. तो तिथेच राहत असावा. तो आपली bike घेऊन आला. त्याच्यासोबत त्याचा अजून एक मित्र दुसऱ्या bike वर होता. मग आम्ही माझं सामान 2 bikes  वर चढवलं. मी दोन हातात दोन contour models, मारुतीने द्रोणगिरी पर्वत पकडल्यासारखी पकडली होती!
त्या मुलांनी मला कोथरूडला पोहचवलं! त्यांचे  मनापासून आभार मानले, ते दोघ निघून गेले.
          इमारतीखालच्या दुकानात सामान ठेवलं. दोन फेऱ्यामारून, चार जिने चढून सगळ सामान एकदाचं रूमवर पोहचवलं! अजून धडधडत होत. आल्यावर सोनमला मिठीच मारली.
          शाळेत गावकर बाईंनी सांगितलेली गोष्ट आठवली, एकदा जपानमध्ये एका बूटाच्या कंपनीत संप झाला. पण कामगारांनी काम नाही थांबवलं. दंडाला काळ्या फिती लावून ते वेळेत कामावर हजार झाले. कामही चालू केलं. पण बनवले फक्त उजव्या पायाचे बुट!त्यांच्या मागण्या मान्य झाल्या! आपल्या देशात 'संप म्हणजे सुट्टी' या नजरेने बघितले जाते. लहानपणी या संपाच्या सुट्टीची मजा यायची. पण हा प्रसंग घडल्यानंतर त्यामागच्या गंभीरतेची कल्पना आली. आपल्याकडे तर शिक्षक, रिक्षावाले,  बस कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, वैमानिक, सरकारी कर्मचारी असे आळीपाळीने संपावर जातच असतात.
         पश्चिम रेल्वेच्या motorman's चा नुकताच झालेला संप आठवतोय ना? सायंकाळच्या, घरी जाण्याच्या, कार्यालये सुटण्याच्या वेळेवर केलेल्या संपामुळे मुंबईकरांची खूप तारांबळ उडाली.खाजगी वाहने, बेस्ट बसेस सगळी वाहने भरभरून चालली होती. रस्त्यावर खूप गर्दी होती. रेल्वे प्लाटफॉर्मवर झालेल्या गर्दीत एका महिलेला आपला जीवही गमवावा लागला. माझ्या कॉलेजपासून घरी येणाच्या रस्त्यावर बाहेरगावी जाणाऱ्या खाजगी बसेस लागतात. त्यांचे वाहक रस्त्यावर उभे राहून ओरडत होते, "बोरीवली 100 रुपये!!!!" मी राहते Elphinstone ला! जिथे Elphinstone ते  बोरीवली 8 रुपये तिकीट आहे, तिथे एकदम, अचानक 100 रुपये सामान्य मुंबईकरांसाठी खूप महाग आहेत हो! विचार करा. लोकांच्या लाचारीकडे पैसे कमवायची 'पर्वणी', 'संधी' म्हणून बघू नका!
          'त्या' रिक्षावाल्याच्या चेहऱ्यावरचे अगतिक भाव आठवत आहेत. रिक्षा चालवली नाही, तर त्यादिवशीच उत्पन्न बुडणार! रिक्षा चालवली, 150 रुपये भाडं ठरवून! रिक्षा चालवल्यामुळे रिक्षाच तर प्रचंड नुकसान झालच पण जमावाकडून मारहाणही झाली.
          समस्या सगळ्यांनाच आहेत. संपालाही ना नाही. पण संप करून सामान्य लोकांचं जीवन वेठीस धरणं कितपत योग्य आहे? संप करणाराही सामान्य माणूसच! उदाहरणार्थ, बसकर्मचारी संपावर गेले म्हणून त्रासणारा माणूस, बँक कर्मचारी असू शकतो. पुढे बँकेचा संप आहे म्हणून बस कर्मचाऱ्याला त्रास होणारच! हे एक दुष्टचक्र आहे. महागाई, भ्रष्टाचार याचे हे परिणाम! हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी मुळापासून प्रयत्न केले पाहिजेत, "सर्व" लोकांनी संघटित झाले पाहिजे! (संपासाठी संघटीत नव्हे!) संप करणे हा काही एकमेव उपाय नाही. संपाच हत्यार खूप धारदार आहे. ते जपूनच वापरल पाहिजे!
       

          

Friday, June 29, 2012

पत्र



              मनात खूप सारे विचार असले, भावना असतील तर लिहिण्यासाठी विचार करावा लागत नाही. सोबत जोडलेलं पत्र मी माझ्या पुण्याच्या मैत्रिणींना लिहलेलं. साधारण एक वर्षापूर्वी,  रात्री काम करत असताना एका वेगळ्याच  आवेगाने आणि ओढीने हे पत्र लिहलेलं. ती ओढ आजही कमी झालेली नाही! Love you my gang! तुम्हाला मी खूप खूप खूप miss करते!

Tuesday, June 26, 2012

मेधाताई

         मी पहिली-दुसरीत असेन तेव्हा. काय माहित,सूर्याचं आणि माझं काय वाकड होत! कधी लवकर उठायचेच नाही.दुपारची शाळा असल्याचा परिणाम! मला उठवण्यासाठी आई वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवायची.
बाबापुता करून उठवायची.
          एक दिवस असेच झोपले होते. सकाळची 10-10:30 ची वेळ असेल. अचानक आई मला हाका मारायला लागली, गदागदा हलवून उठवायला लागली. म्हणाली, "खिडकीजवळ चल पटकन. बघ केवढी लोक जात आहेत खालून." मला उठवण्याचा एक प्रयत्न असं समजून मी दुर्लक्ष केलं, पण आई मला ओढतच घेऊन गेली.
          खरचं, रस्त्यावरून एक मोर्चा चाललेला होता. ती माणसं गरीब वाटत होती. कुठल्यातरी गावातून आलेली असावीत. नजरेत एकप्रकारचा बावरलेपणा होता. नऊवारी साडीतल्या बायका, डोक्यावर गाठोडी ठेवून चालत होत्या. सदरा-लेंगा आणि डोक्यावर गांधी टोपी असा पुरूषांचा पोशाख होता. काही बायकांच्या कडेवर त्यांची तान्हुली होती. म्हातारेकोतारे, स्त्री-पुरुष, लहान मुलं, तरुण सगळेच त्या मोर्च्यात सहभागी झाले होते. काही माणसांनी हातात banner पकडले होते. घोषणा देत ते चालले होते, पण कुठेही गोंधळ नव्हता, एक शिस्त होती त्या मोर्च्याला! घोषणा देत असले तरी एक शांतात होती त्या मोर्च्यात!
          तेवढयात एक बाई मागून घोषणा देत आल्या. हातात फलक होता. फिक्कट केशरी रंगाची पाचवारी साडी, अगदी साध्याच होत्या त्या. "अरे यांना तर कुठेतरी पाहिलं आहे" मी आणि आई एकदम उद्गारलो.
कुठे बर? अचानक आईला आठवलं,"अरे या तर मेधा पाटकर!" माझ्या इमारतीखालून चालत गेल्या!!
त्या नजरेआड होईपर्यंत मी त्यांना पाहत होते.
          जास्तीत जास्त एक मिनिट मी त्यांना पाहिलं असेल, पण तो प्रसंग अजूनही नजरेसमोरून जात नाहीये. हेही आठवत नाहीये की, तो मोर्चा कशासाठी होता, ते सगळे कुठून आले होते. पण किमान माझ्यासाठी तरी, हा प्रसंग खूप विशेष आहे.
          कोण,कुठल्यातरी खेड्यातले लोक, त्यांच्या हक्कांसाठी एखादी व्यक्ती आपला स्वार्थ सोडून प्राणपणाने झटते, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल मनात आदर दाटून येतो. मला त्या माणसांच्या चेहऱ्यावारचे भाव आठवत आहेत, विसरूच शकत नाही मी! आणि मेधाताईचा आवेशही आठवतोय. Helicopter ने दुष्काळाची पाहणी करणारे आपले राज्यकर्ते आणि लोकांना संघटीत करून,त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरणाऱ्या मेधाताई यांच्यात फार फरक आहे! hats off to you मेधाताई!


Saturday, June 23, 2012

असचं एक पान!

दिनांक: 04/09/2011
स्थळ : महाविद्यालयाचे वाचनालय 
           
             
           आता सकाळचे 9 वाजत आले आहेत. वाचनालयात बसले आहे. कारण मला म्हात्रे सरांनी वर्गाबाहेर काढलं आहे. "Today you are not sitting in my class." असे शब्द कानावर पडले नि माझे डोळे झरायला लागले. कारण..कारण मी पालकांना आणलं नाही. त्यांना दादाला भेटायचय. पण दादा पाचदिवसांची सुट्टी रद्द करून कालच पुण्याला गेलाय. त्याला मी म्हटलं,आज शक्य नसेल तर शुक्रवारी भेटलास तरी चालेल आणि आता पालकांना आणल्याशिवाय वर्गात बसायचं नाही! 
            दादा तरी काय करणार? दोन दिवसांपूर्वीच UK वरून आलाय. रविवारी थोडा आराम करून काल, सोमवारी पहाटे 4:30 लाच तो पुण्याला गेला. मी सरांना म्हटलं,"मी आईला बोलावू का?" But he clearly said, "First you leave the class." 
             शलाका सावंत,'पालकांना आणलं नाही',हे एकच कारण आहे का??? मुळात पालकांना बोलवायची वेळच का आली? आणि पालकांना बोलावल्यानंतरही आपण 'AD' चं  काय केलंत?आणि आता तर आधी resolve करा आणि मगच पालकांना बोलवा. माझी बाजू नक्कीच कमकुवत आहे आणि 100% दोष माझाच आहे. so...don't think now.


9:30am 
            बाहेर काढल यापेक्षा आपण निष्क्रीय आहोत याच वाईट वाटतय. काय बोलणार!

10:00am 
           चांगला अनुभव नाही आहे हा. वाचनालय, कुमार  आणि आता जिन्यात बसतेय. देवा मदत कर मला...

          संदर्भ:  माझ्या अभ्यास्याच्या वह्यांमध्ये शेवटची,मधली पानं अशीच भरलेली असतात. भरभरून लिहायला मला फार आवडतं. 'ती' परिस्थिती, घटना मला लिहायला प्रोत्साहन देते. 

Sunday, June 17, 2012

मराठी-इंग्रजी

        आयुष्यात  बदल किती चटकन घडतात. पुण्यातले होस्टेलचे दिवस आजही लख्ख आठवतात. असं वाटत कि कालच सगळ घडून घेलाय...आणि कधी कधी वाटत , कि मी अजुनहि भूतकाळातच जगत आहे. असो. यापूर्वीही मी ब्लॉग लिहायाचा प्रयत्न केला..एकच  लेख  होता त्यात आणि  "मी माझा ब्लॉग मराठीतून लिहित आहे आणि सध्यातरी इंग्रजीतून लिहू शकणार नाही" अस लिहलं होत. न्यूनगंड!
        माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून  झालं. शारदाश्रम  विद्यामंदिर मधून.त्यानंतर अकरावी  आणि बारावी मी दादरच्या कीर्ती महाविद्यालयातून. कीर्तीच वातावरण अस होत कि, कधी इंग्रजीतून बोलायची वेळ  नाही आली. त्यानंतर Architecture ला प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला. प्रवेश मिळाला, पुण्याच्या MMCA मध्ये. तिथले दिवस छान होते. कामापुरत  किंवा  कामचलाऊ  इंग्रजी चालून जायचं. किशोरी, अपूर्वा, ऋतुजा, तृप्ती , जान्हवी सारखे कॉलेज सवंगडी मिळाले. सगळेच  मराठी बोलणारे.. सगळ छान चाललं होत. अगदी मजेत  चालल होत!
         आणि एक दिवस मी कॉलेज बदललं. Architecture च्या दुसऱ्या वर्षासाठी मी मुंबईच्या रचना संसदला प्रवेश घेतला. रचना म्हणजे hi -fi  कॉलेज! मस्करी सोडा, पण आतापर्यंत मी ज्या वातावरणात वाढले, त्यापेक्षा नक्कीच  वेगळ वातावरण होत . विशेषतः सांस्कृतिक वातावरण. आणि ते  वातावरण पाहता एक दडपण आलं  होत माझ्यावर. विशेषतः इंग्रजीची भीती! 'आपण काही चुकीचं तर बोलणार  नाही ना?',' व्याकरण वैगरे चुकलं  तर?' असे विचार सतत मनात येत असत. अजूनही येतात . आणि मी संवाद साधनच  सोडून दिल. शाळेत वकृत्व स्पर्धांत सहभागी होत असे, आणि त्यातली  माझी समजही चांगली होती. किंबहुना मी कधीच लाजाळू नव्हते. आजही घरी अखंड बडबड चालू असते. पण  कॉलेजमध्ये...कॉलेजमध्ये माझं बोलणंच संपलय. हजारो विचार आणि कल्पना डोक्यात थैमान घालत असतात. परंतु ते विचार व्यक्त  करायचं  मध्यम  म्हणजेच  भाषा जेव्हा अडसर ठरते, तेव्हा मूक  झाल्यासारखं वाटत.
          या प्रश्नाला समोरी जाणारी मी एकटीच आहे असं  नाही.माझ्या वर्गातच असे बरेचसे विद्यार्थी आहेत.
मला नेहमी असं वाटत कि, समजा हाच अभ्यास मी मराठीतून केला असता तर? सध्या मी बरेच सावरले  आहे. इंग्रजी ठीकठाक  बोलू शकते. प्रसंगी Google translator किंवा ginger grammar check ची  मदतही  घेते.
पण...
          पण मला अस वाटत कि, माझा अभ्यास हा मी इतर कुठल्याही भाषेपेक्षा, मला अवगत असलेल्या भाषेत नक्कीच चांगला करू शकते. कारण माझा इंग्रजीतील शब्दसंग्रह (vocabulary) इतका समृद्ध नाही.
कधी कधी असही वाटत, आपण  मराठीचं वाचन,शब्दसंग्रह, समज  वाया घालवत  आहोत का?
         Architecture चा  अभ्यास मी इंग्रजीतून  करू शकत नाही,अस नाही. पण मला तो  ओढूनताणून नाही करायचा  आहे . म्हणजे मी  विचार  मराठीतून  करणार, कागदावर इंग्रजीतून उतरवणार, समोरच्याला  समजून सांगण्यासाठी भाषांतर करणार. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझा 'विचार' , माझी 'संकल्पना' कुठेतरी हरवत  जातेय ! मला खरंच  उथळ  अभ्यास  नाही करायचा  आहे.
         मला माहित आहे कि, हा अभ्यास इंग्रजीतून असण्यामागे नक्की चांगलाच आणि योग्य हेतू असेल. पण   आजही माझ्यासारखे खूप विद्यार्थी या पेचात पडले आहेत .त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि एका समृद्ध भाषेच्या जतन करण्याच्या दृष्टीने काहीतरी सुवर्णमध्य नक्कीच निघेल.